Thursday, January 31, 2013

जाती-वर्ग विरहित समाज



भारतीय संस्कृती या नावानं ओळखली जाणारी जी भव्य आणि समग्र अशी व्यवस्था आहे तिच्यासमोरचं वर्तमानकाळातलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे जातीव्यवस्था.
    भारतीय संस्कृतीतल्या बाह्य आविष्कारांमधली बहुविधता त्या बहुविधतेचा आदरपूर्वक स्वीकार आणि तरीही त्या सर्व बहुविधतेला एकत्र गुंफत जाणारी आंतरिक एकात्मता, यापुढे आधुनिक तत्त्‍वप्रणालींमधले पोस्ट-मॉडर्निझम्‌, प्लुरॅलिझम, मल्टिकल्चरॅलिझम्‌, लिबरॅलिझम्‌, डायव्हर्सिटी वगैरे कल्पना फिक्या पडतात, उथळ आणि वरवरच्या ठरतात.
    आता अशा या प्रगल्भ, काळानुसार बदलत असतानाच मूळ गाभा मात्र सांभाळू शकणार्‍या लवचिक भारतीय संस्कृतीच्या नरडीभोवतीच्या, रोज अधिकाधिक घट्ट आवळत जाणारा फास म्हणजे जातीव्यवस्था.
    सकल जातीव्यवस्था हेच सर्वांत मोठं आव्हान आहे. केवळ जातीभेद, अस्पृश्यताच नव्हे, संपूर्ण जातीव्यवस्थाच - भारतात जातीव्यवस्थेचा शाप ख्रिश्‍चॅनिटी आणि इस्लामसकट सर्वांनाच लागलाय - माणसाचं समाजातलं स्थान जिथे जन्मावरूनच ठरतं, जिथे जातींच्या भिंतींपायी माणसांची एकमेकांकडे पहाण्याची दृष्टीच संशयी आणि विषारी बनते, बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात जी एक जिना नसलेली इमारत आहे. ज्या मजल्यावर तुम्ही जन्माला येता त्याच मजल्यावर मरता अशी ‘बाय डेफिनिशन’ जातीव्यवस्था हेच संस्कृतीसमोरचं आव्हान आहे. विषमता, अस्पृश्यता, शिवाशीव, समाजव्यवस्थेचा पिरॅमिड, त्यातली उच्चनीचतेची उतरंड हे व्यवस्थेचेच अपरिहार्य परिणाम आहेत. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे आता जातीव्यवस्था हे राजकीय अभिसरणाचं साधन बनलंय.
    स्वातंत्र्यानंतर पाठीवर राजा राममोहन रॉय यांच्यापासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंतचा समाजसुधारणा चळवळींचा प्रदीर्घ वारसा घेऊन आपण वाटचालीला सुरुवात केली. नवा भारत घडवतानाचं आपलं सर्वांचं स्वप्‍न होतं जाती-वर्ग विरहित समाजरचनेचं. बघता बघता या कोणत्या देशात येऊन पोचलो आपण सगळेच की सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचं ‘जात’ हेच मुख्य युनिट बनून राह्यलंय. जो उठतो तो जातीचा हुक तयार करून सत्तेची साठमारी करू पाहतो. सत्तासंघर्षाच्या धुंदीत हे लक्षात येत नाही की संस्कृतीलाच गळफास बसतोय. जातीय जाणीवा आधुनिक भारताला एकात्म राष्ट्र बनवण्यापासून वंचित ठेवतात.
    अशा वेळी प्रकाश आंबेडकरांनी या सप्‍ताहात सांगितलेली सूत्रं फार मोठी ‘व्हिजन’ मांडणारी आहेत. ते म्हणतात राजकीय क्षेत्रात राखीव जागांची आवश्यकता उरलेली नाही. ‘फोर्स्ड इंटिग्रेशन’ पेक्षा मनापासून होणार्‍या इंटिग्रेशनचा मार्ग स्वीकारला पाहिजे. शाळेच्या दाखल्यापासून ‘जात’ हा कॉलमच काढून टाकला पाहिजे. सर्व संबंधित ठिकाणी ’जात’ सांगणं-लिहिणं ऐच्छिक ठेवलं पाहिजे. २०११ च्या जनगणनेत जात सांगणं ऐच्छिक होतं. पण कसाबसा १% लोकांनीच जात न नोंदवण्याचा पर्याय स्वीकारला. जोपर्यंत व्यक्‍तीविषयी घेतल्या जाणार्‍या सार्वजनिक निर्णयांचा आधार ‘जात’ हा आहे, तोवर बहुसंख्य जण स्वतःची जात नोंदवण्याचाच पर्याय निवडणार. प्रकाश आंबेडकर सुचवताय्‌त की हा ‘जात’ हा निकष आणि आधारच बदलावा.
    प्रकाश आंबेडकर फार मोठ्या दूरदृष्टीचं काही बोलताय्‌त. त्यांची विधानं, त्यामागचे दृष्टिकोन यांना किमान शब्द वापरायचा तरी ‘धाडसी’ आणि ‘क्रांतिकारक’ म्हणावं लागेल. राजकीय क्षेत्रातल्या राखीव जागा काढल्या तर दलित समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत समान आणि सन्मानाचं स्थान मिळेल का, ‘समानांची समता’ आणि ‘संधीची समानता’ राहील  का हे प्रश्‍न निर्माण होतातच. पण प्रकाश आंबेडकरांच्या म्हणण्याचा अर्थ होतो की समाजकारणातल्या राखीव जागांमुळे दलित नेतृत्‍व जातीपुरतंच मर्यादित, बंदिस्त होऊन जातं. जातीच्या वर उठत ते सर्वांना बरोबर घेत सर्वमान्य नेतृत्‍व होऊ शकत नाही. एवढ्या अर्थानं मायावतींनी, सर्वांना बरोबर घेत दलित नेतृत्व स्वतःच्या बळावर सत्तेपर्यंत पोचू शकतं, एवढं तर दाखवून दिलं. प्रकाश आंबेडकरांना भारतीय ओबामा होण्याचं क्षितिज दिसतंय, कळतंय? काहीही असलं तरी त्यांची विधानं, भूमिका मोठ्या दूरदृष्टीच्या, धाडसी आणि क्रांतिकारक आहेत. आजपासून ५०-१०० वर्षांनी मागे वळून पहाताना इतिहास असं म्हणणं शक्य आहे (त्यावेळी आपली मानवी आणि भारतीय संस्कृती शिल्लक आणि समृद्ध असेल तर) की एका फार मोठ्या परिवर्तनाची सुरुवात प्रकाश आंबेडकरांनी करून दिली. उलट सुलट प्रतिक्रिया उठत रहातील, राहू दे - उठाव्यातच. ते जिवंतपणाचं लक्षण आहे. विविध वादविवाद, वितंडवाद, आरोप-प्रत्यारोप, हेत्वारोप होत रहातील - तेही होऊ दे. अशा मंथनातूनच अमृत बाहेर पडत असतं. आपल्या देशात क्रांतिकारक बदलही उत्क्रांतीच्या गतीनं होतात. पण एवढं तर निश्‍चित की प्रकाश आंबेडकरांनी प्रचंड मूलभूत विषयाला तोंड फोडलं. आपल्या समाजव्यवस्थेच्या आंतरिक विसंगतींचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे अशा विषयाला आंबेडकरच तोंड फोडू शकतात, अन्य कुणी नाही.
    काही काळापूर्वी बाळासाहेब विखे - पाटलांनीही दोन दीर्घ लेखांमधून मांडलं होतं की जातीच्या नावानं राजकारण करणारा नेता, देशाचं तर सोडाच, जातीचं सुद्धा भलं करत नाही, तो फक्‍त स्वत:चं दुकान चालवतो. सत्तेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या विखे - पाटलांनी हे मोठंच परखड धैर्य दाखवून दिलं होतं. पद्मश्री  विखे - पाटलांनी महाराष्ट्राला सहकार चळवळीची दिशा दाखवून दिली होती, बाळासाहेब विखे - पाटील जातीपातींच्या पार जाणार्‍या राजकारणाची दिशा दाखवण्याचा प्रयत्‍न करतात. प्रकाश आंबेडकरांची सूत्रं ही त्याच मालिकेतली सुधारित आवृती आहे. हरियाणात जाट, राजस्थानात गुजर, महाराष्ट्रात मराठा समाज, आंध्रमध्ये मुस्लिम समाज राखीव जागांची मागणी करत असताना, प्रकाश आंबेडकरांनी म्हणणं की राजकीय क्षेत्रात आता राखीव जागांची गरज नाही, दाखल्यावरून जात हद्दपारच  करा - ही शतकभराचा प्रवाह पालटवून टाकणारी, नवा प्रवाह निर्माण करणारी ‘व्हिजन’ आहे. अनेक सुज्ञ, चतूर राजकीय नेते ही ‘व्हिजन’ दुर्लक्षानं मारण्याचा प्रयत्‍न करतीलच. पण इतिहासाचा प्रवाह असा केवळ व्यक्‍तींच्या विधानांवरून वहात नाही. इतिहासाची एक आपली गती आहे. भारताला ती गती जाती - वर्ग विरहित समाजरचनेकडे नेणारी हवी आहे. त्या दिशेनं आपली प्रगती होईल की नाही आता सांगता येणार नाही. पण प्रकाश आंबेडकरांनी त्या गतीचं ‘धम्मचक्रप्रवर्तन’ केलं हे निश्‍चित.        
    आपल्याला भारताच्या समस्यांचा अभ्यास करून काम करणारा कार्यकर्ता व्हायचं  असं ठरवल्यावर माझे जे प्रवास चालू झाले ते मला उत्तरप्रदेश, बिहारमध्ये घेऊन गेले होते. तिथे ३० वर्षांपूर्वीच कोणाला भेटलो, ओळख झाली तर उशीरात उशीरा दुसरा प्रश्‍न असायचा ‘कौन जात’. मला धक्का बसायचा. एखाद्या व्यक्‍तीला जात विचारणं असभ्यपणाचं आहे असं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वातावरण होतं तेंव्हा. मला कायम अभिमान वाटायचा की प्रबोधनाची प्रदीर्घ परंपरा असलेल्या प्रदेशात आपण वाढलो. तर त्यानंतरच्या पाव शतकात बघता बघता महाराष्ट्राची वाटचाल सुध्दा सर्वस्वी जातीय वाटेवरच झाली. व्यक्‍तीची जात विचारण्याचा संकोच वाटणं राहिलं दूर, मोठे मोठे नेते सुद्धा आपली प्रतिमा सर्वांना बरोबर घेणारा यापेक्षा विशिष्ट  जातीचा नेता म्हणून मांडण्यात धन्यता समजू लागली. महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक  जीवन गढूळ, विषारी, उलटीकडे वहाणारं बनून राहिलं.
    ‘न्यूरोसायन्स’वरचा एक ग्रंथ वाचताना मला कळलं की आपलं कोण परकं कोण हे मेंदूच्या सर्वांत आतल्या भागात ‘अमिग्‍डाला’ (Amygdala) मधे ठरतं. मेंदूचा हा भाग जैविक उत्क्रांतीच्या ‘रेप्टईल’ पातळीपासूनचा आहे. उत्‍क्रांतीच्या प्रक्रियेत मेंदूवर नवे नवे स्तर चढत मानवी मेंदूपर्यंत  पोचलो आपण. तेंव्हा मला वाटलं की अजूनही ज्यांच्या मेंदूत सगळी जातीपातींचीच गणितं आहेत ते उत्‍क्रांतीच्या टप्‍प्‍यात अजून मागासलेलेच राहिलेत. मेंदूच्या विकसित स्तरांच्या साक्षीनं समाजरचनेचं सूत्र सांगायचं तर ते ‘जाती - वर्ग विरहित समाजरचनेचं’ सूत्र सांगावं लागेल.
    गुणवत्तेचा मक्‍ता कुणाही विशिष्ट जातपात - धर्मपंथ - भाषा - प्रदेश - लिंग यांना दिलेला नाही. तो प्रत्येक उत्क्रांत  मानवी मेंदूचा अभिजात वारसा आहे. स्वत:तली गुणवत्ता ओळखून विकसित करण्याची समान संधी समाजाच्या सर्व घटकांना हवी, हा इतिहासाच्या प्रवाहाचा मार्ग आहे. यातच उज्‍ज्‍वल भविष्यकाळाचं आश्‍वासन आहे.

3 comments:

  1. Dear sir,
    Tumhi manta tase Ji Jaat nahi ti Jaat .

    sir ek vinanati aahe ki , tumhi lekh he kiman 8 diwasala tari lihit ja . Tumche lekh nuste lekh nahit tar te aamrut aahe ase mi manel . Mi tar roj sandhyakali tumcha blog baghto pan nirashach bhetate aaj amrut pilyasarkhe watatey.
    NTR sarkhi dering karun paha tumhi pan yash milel maharashtra khup kadarlay hya rajkarnyana...

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. Sir , mi mhanto ata purwi sarkhich paristhiti nahi . Tewha tumhi mhantay ani ambedkar mhantayet tasa 'jaat' ch kadhun takuyat . ani prashna arakshana cha asel tar arakshan arthikparisthivar deuyat . Mhanje yogya lokanna yogya fayda hoil . Ani arakshana chya nawa khali kuthetari thodi pasarleli vishamata dur hoil .

    ReplyDelete