Tuesday, March 11, 2014

अंधेरनगरीचा न्याय

...आणि आपण सगळेच
  लेखांक १०१
         

 सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

अंधेरनगरीचा न्याय
मराठी दिवसाचे चांगले पांग फेडले सरकारनं. २७ फेब्रुवारी हा कविकुलगुरु कुसुमाग्रजांचा जन्मदिवस. आता तो आपण सगळेच मराठी दिवसम्हणून पाळतो. त्या सुमुहूर्तावर मुंबईमध्ये मातंग समाजाला पोलिसांनी लाठ्यांनी तुडवून काढलं, मराठी दिवस साजराकेला.
     मान्य, की मातंग समाजाचा मोर्चा पूर्वनियोजित नव्हता, त्याची लेखी पूर्वसूचना प्रशासनाला दिलेली नव्हती. तरी पण त्याच्याशी, त्याच्या प्रतिनिधी मंडळाशी विश्वासात घेऊन बोलतो म्हणणारा कोणीच जबाबदार सरकारी प्रतिनिधी नव्हता का? बरं, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याएवढी कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रसंगी लाठीमारही मी समजू शकतो. पण इथे दिसलं की मोर्चातले मातंग बांधव चारी दिशांनी सैरावैरा पळत सुटलेत. त्यांना पाठलाग करकरून तुडवलं जातंय. तावडीत सापडलेला एखादा हात जोडतोय आणि/ पोलिस त्याच्या नडगीवर लाठीचे सपासप वार करताय्‌त.
     काय होतं पोलिसला? डोक्यात खून चढतो? लाठीची नशा भिनते?
     की पोलिसच्या प्रश्नांकडे कुणीच जबाबदार नेता लक्ष देऊन प्रश्न सोडवत नाहीये, ड्यूटी मात्र उरावर बसलीय,२४/; खाण्यापिण्याची आबाळ, घरादाराकडे दुर्लक्ष, मुलांनाही आपले पोलिस वडील मिळत नाहीत, राहायला नीट घरं नाहीत, त्यामुळे चिरडीला आलेल्या पोलिसच्या नर्व्हज्‌’, लाठीहल्ला सुरू झाला की तुटतातच का? सगळा राग आता तावडीत सापडलेल्या निर्बल नागरिकांवर निघतो का?
     पण पोलिसलाही कोणी प्रशिक्षण दिलेलं नसतं का, की अरे हे मातंगही माझेच बांधव आहेत, मी आवश्यक तर माझं कर्तव्य, कठोरपणे करीनही, पण हा देश, हे लोक माझेआहेत याचं भान ठेवून करेन.
    
मातंग समाज आजही मुख्यत: गरीब समाज आहे. आपल्याच मोठ्या व्यक्तींची जातीनिहाय वाटणी करण्याच्या आपल्या जेनेटिकसवयीनुसार मातंग समाजाचे आधुनिक कुलपुरुषम्हणजे आण्णाभाऊ साठे. आण्णाभाऊ साठेंच्या साधू, फकिरा, वारणेचा वाघ या कादंबर्‍यांनी मराठी साहित्य समृद्ध करून ठेवलंय. माझ्या मते आण्णाभाऊ साठेंचं साहित्य नोबेलच्या योग्यतेचं होतं (म्हणजे नोबेलम्हणजे काही एकमेव मानदंड आहे, असं नाही. पण एक आपली, मुद्द्याचं मॅग्निट्यूडमांडण्यासाठी उपमा, इतकंच.) तर काय, की त्यांच्या नावानं महामंडळ काढलं,
ऑगस्टला (आण्णाभाऊंचा जन्मदिवस) त्यांच्या तस्विरीला हार-फुलं-गुच्छ वाहिले, की नंतर मातंग समाजाला लाठ्याकाठ्यांनी तुडवून काढलेलं चालेल.
     अरे एवढं तर गुरांना सुद्धा मारत नाहीत. मारू नये. कुणी मारलं तर त्याच्यावर क्रुएल्टी टु अॅनिमल्स्‌कायद्याखाली कारवाईची तरतूद आहे. कुठे क्रुएल्टी टु ह्यूमन बीईंगकायदा नाही का?
     शिवाय लक्षात घ्या, की हे लोकसभा निवडणूक ऐन तोंडावर असताना घडतंय. भोवती कॅमेरे आहेत, व्हिडिओ चित्रण होतंय, दिखाऊपणाचं धोरण म्हणून तरी पोलिसनं हात आवरता घ्यावा. पण नाही. सैरावैरा पळणार्‍या मातंग माणसांना तुडवलं जातंय. ही संवेदनशून्यता की बेदरकारपणा? की ताळतंत्र सुटल्याचं लक्षण?
     ही २३ नोव्हेंबर १९९४ च्या गोवारी कांडाचीच मिनी-पुनरावृत्तीझाली म्हणायचं. नागपूरला विधानसभेचं हिवाळी अधिवेशन होतं (मी अजून शासकीय सेवेत होतो, रायगडचा कलेक्टर. तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त शेषन यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार ओळखपत्र तयार करण्याचं काम टॉप गियरमध्ये चालू होतं.) विदर्भातली एक अत्यंत गरीब, आदिवासी जमात म्हणजे गोवारी’. आपल्या मागण्या आणि फडक्यात बांधलेला भाकरतुकडा घेऊन गोवारी आबालवृद्ध नागपूर विधानसभेजवळच्या मॉरिस कॉलेजपाशी जो टी जॉईंटआहे, तिथे जमले. मंत्री महोदय किंवा वरिष्ठ सचिव आत्ता येतील, मग येतील करत सारा दिवस लोटला. आपलं साधं म्हणणं ऐकायला सुद्धा कुणीही जबाबदार व्यक्ती समोर येत नाहीये, उलट आपल्याला दिवसभर नुसतं झुलवत ठेवलं जातंय असं लक्षात आल्यावर हजारोंचा गोवारी समुदाय अस्वस्थ झाला. बॅरिकेडिंग तोडून विधानसभेकडे तो घुसेल अशा शक्यता निर्माण झाल्यावर पोलिसनं लाठीहल्ला केला - गोवारी स्त्री-पुरुष बाल-वृद्ध चौखूर धावत सुटले. पण पळायलाही जागा नव्हती. नुसत्या चेंगराचेंगरीत ११४ माणसं मेली, ५०० हून जास्त जण गंभीररित्या जखमी झाले.
     मराठी दिवसाला मुंबईत मातंग समाजाला पळायला जागा होती, हे नशीब. आता या सर्वांवर चौकशी समिती, अहवाल, ठपका, सरकारनं तो नाकारणं आणि पुन्हा सगळे पहिले पाढे पंचावन्‌ केंव्हा व्हायचे तेंव्हा होवोत,
     तूर्त तरी हे सर्व कर्मकांड मावळ गोळीबाराबाबत षोडशोपचारे पार पाडणं चालू आहे.
ऑगस्ट (काय तारीख आहे, क्रांती-दिन!) २०११ ला मावळमधल्या शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे अडवला होता. शेतकर्‍यांची मागणी शेतीचं पाणी शहरी क्षेत्राकडे वळवू नका. मागणीवर मतभेद असू शकतात, चर्चा होऊ शकते. रस्ता रोको मोडून काढून महामार्ग मोकळा करण्याची कायदेशीर - प्रसंगी कठोर सुद्धा - कारवाई मी समजू शकतो. पण महामार्ग मोकळा झाला, शेतकरी म्हणा किंवा आंदोलनकारी म्हणा, सैरावैरा धावत सुटलाय - त्यांना पाठलाग करून गोळ्या घातल्या जाताय्‌त, पोलिसच्या दुर्दैवानं याचं व्हिडिओ चित्रण झालं. पोलिसचं म्हणणं आहे की आंदोलनकारी हिंसाचार माजवण्याच्या तयारीत आले होते. समजा मान्य. पण शेतातून पळत सुटलेल्यांवर गोळीबार. सरकारनं नेमलेल्या न्या.पाटील समितीनं पोलिसचा युक्तिवाद नामंजूर करत पोलिस अधिकार्‍यांना दोषी ठरवलं.
     सरकारनं अहवाल नाकारलाय.
     आजच्या तारखेला एकीकडे पोलिस खातंच, पोलिस मनुष्यबळ समस्यांनी गांजलेलं आहे. खात्याच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष नाही. समाजामध्ये पोलिसची प्रतिमा चांगली नाही. काही जणांचा तरी बॅलन्स्‌ जातोय. कुणी आत्महत्त्या करतोय, कुणी - हा तर माझा बॅचमेट्‌ असलेला IPS अधिकारी - हॉटेलात जेवताना बायको-मुलांसमोरच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं डोक्यात गोळी झाडून घेतोय - कुणी सर्व बायका-मुलांना मारून मग शेवटची गोळी स्वत:च्या डोक्यात घालतोय - कोणी त्या गोळ्या आपल्याच चौकीवर सहकार्‍यांना, वरिष्ठांना घालतोय... सरतेशेवटी दुसरं कोणी मिळालं नाही तर प्रतिकारशून्य सामान्य माणूस आहेच.
     सध्या पोलिस खात्याचं नीतिधैर्य रसातळाला गेलंय. खात्यातच गुन्हेगारी जगताचा शिरकाव झालेला आहे. विरुद्ध गँगज्‌च्या सुपार्‍या घेण्याचे प्रकार दिसून आलेत. प्रचंड भ्रष्टाचार, जातीपाती आणि भाषा-प्रदेशांनुसार पोलिस खात्यात सुद्धा अनेक चिरफाळ्या आहेत. ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे. वेळेत दुरुस्त केली नाही - अजून उशीर झालेला नाही, परिस्थिती अजूनही सावरता येईल - असं आपलं मला वाटतं - तर मात्र ही वाटचाल विनाशकारी आहे.
     त्या संभाव्य धोक्याची पूर्वसूचना ११ ऑगस्ट २०१२ ला रझा अॅकॅडमीनं आझाद मैदानावर, म्यानमारमधल्या रोहिंगिया मुस्लिम आणि कोक्राझारमधल्या बेकायदेशीर घुसखोर बांगला देशींची बाजू घेण्यासाठी योजलेल्या सभेत दिसून आली. पोलिसवरच हल्ला चढवण्यात आला. महिला पोलिसांच्या अब्रूवर हात टाकण्यात आला. ती परिस्थिती सावरायला पावलं उचलणार्‍या पोलिस उपायुक्ताला मुंबईच्या पोलिस आयुक्तानं सर्वांसमोरच घाणघाण शिव्या दिल्या, पकडलेल्या धर्मांध गुंडांना सोडायला सांगितलं. दुसर्‍या काही गुंडांनी अमरजवान ज्योतीउन्मत्तपणे तोडली.
     या प्रकारानं अस्वस्थ झालेल्या महिला इन्स्पेक्टरनं कविता लिहिली. नुसती कविता पाहिली, तर ती हृदयस्पर्शी आहे - माझ्या मते, त्यात कोणतीही धर्मांधता, द्वेष किंवा हिंसाचार नाही. पण सरकारनं त्या महिला इन्स्पेक्टरला ती कविता मागे घेऊन माफी मागायला लावली.
     गोवारी, मातंग आणि मावळच्या शेतकर्‍यावर लाठीहल्ला, गोळीबार.
     आणि अत्यंत आक्रमक, हिंसक, धर्मांध मुस्लिम गुंडांसमोर शरणागती आणि माफी -
     हे कोणतं कायद्याचं राज्य आहे (राज्यघटना कलम १४), यात कोणती कायद्यासमोर समानता आहे (कलम १५) आणि यात कुठे आलं कायद्याचं सर्वांना समान संरक्षण (कलम १६)? का जॉर्ज ऑरवेल्‌च्या ऑल आर इक्वल बट्‌ सम आर मोअर इक्वलअशा अॅनिमल फार्मची भारतीय आवृत्ती?
     ‘सम आर मोअर इक्वलच्या यादीत बसतो संजय दत्त. १२ मार्च १९९३ ला दाऊदच्या मदतीनं टायगर मेमन, याकूब मेमनच्या माध्यमातून आय्‌.एस्‌.आय्‌.नं मुंबईत घडवलेल्या बॉम्बस्फोटातला एक आरोपी संजय दत्त. त्याचे गुन्हेगारी जगाशी संबंध दिसून आलेत. पण त्याच्यावरचा देशद्रोहाचा गुन्हा कमी करून फक्त बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या आरोपाखाली उच्च न्यायालयानं वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली. अपीलात सर्वोच्च न्यायालयानं ती शिक्षा कमी करून वर्षांवर आणली, त्यापैकी साडेतीन वर्षं संजय दत्तनं तुरुंगवास भोगून झाला होता. उरलं दीड वर्ष. तर ती पण शिक्षा होऊ नये, माफी द्यावी, संजूबाबा किती निर्मळ मनाचा संत सज्जन निरागस बालक आहे असं सांगत अर्धं तरी बॉलिवुड त्याच्या बाजूनं रस्त्यावर उतरलं. बॉलिवुडवर गुन्हेगारी जग, दोन नंबरचा पैसा आणि देशद्रोही घटकांचा किती प्रभाव आहे तो दिसून आला.
     पण संजूबाबाला येरवड्यात जावं लागलं. तर आत्तापर्यंत कधी ऐकू न आलेलं फर्लोनावाचं लफडं कानावर यायला लागलं. संजय दत्तला सुट्टीमागून सुट्टी. शेवटी आता न्यायालयानंच डोळे वटारले. चालू आठवड्यात तत्कालीन पोलिस आयुक्त एम्‌.एन्‌.सिंग यांनी सांगितलेलं आहे की संजय दत्तविरुद्धची कारवाई सौम्य, शिथिलपणे करा अशा त्यांना सूचनावजा दबाव, दबाववजा सूचना होत्या. अशा सूचना करणारे कोण असं विचारल्यावर मात्र एम्‌.एन्‌.सिंग गळाठले.
    भारतात लाखाच्या भाषेत असे आरोपी तुरुंगात सडत पडलेत की ज्यांना जामीन द्यायला कुणी पुढे येत नाही, ज्यांच्यावरची केस सुनावणीला येऊन निकाली होत नाही. आरोप सिद्ध झाले तर जेवढी शिक्षा होईल त्यापेक्षा जास्त वर्षं ते तुरुंगात काढतात. ही परिस्थिती बदलण्याबाबत निकाल आणि आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत, पण अंमलबजावणी जवळजवळ नाहीच.
     देशद्रोही, गुन्हेगार संजय दत्तसाठी फर्लो’!
     आणि सुब्रतो रॉयच्या पोलिस कोठडीसाठी फॉरेस्टचा बंगला!
     लालूप्रसाद चारा घोटाळ्यात गुन्हेगार म्हणून सिद्ध झाल्यावर थोडे दिवस तुरुंगात बसून बाहेर आल्यावर पंतप्रधान होण्याची भाषा बोलू शकतात.

     ...आणि आपण सगळेच तुरुंगात जाऊ या.

Thursday, March 6, 2014

अशोक जैनच्या निमित्तानं

...आणि आपण सगळेच

  लेखांक १००



सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

अशोक जैनच्या निमित्तानं
     यक्षप्रश्न. महाभारताच्या वनपर्वातली ही कहाणी. द्यूतामध्ये हरलेले पांडव, १२ वर्षं वनवास - नंतर वर्ष अज्ञातवास - भोगताय्‌त. त्यापैकी वनपर्वाच्या काळात पांडव भारतभ्रमणासाठी तीर्थयात्रा करत फिरतात. त्यात कोणे एके ठिकाणी जंगलात वाट हरवतात. तहान-भुकेनं व्याकूळ होतात. थकून, दमून, घशाला कोरड पडून एका जागी बसतात. त्यांच्यात ठरतं की कुणीतरी एकानं जाऊन पाणी शोधून काढायचं. त्या काळातल्या कुटुंबव्यवस्थेच्या संकेतानुसार सर्वांत आधी धाकट्या भावानं जायचं, म्हणून सहदेव जातो.

     पाण्याच्या ओल्या वासाचा वेध घेत सहदेव एका तळ्यापाशी पोचतो. पाणी भरून घेणार तेवढ्यात तळ्यातून यक्ष प्रकट होतो. सहदेवाला म्हणतो, हे माझं तळं आहे, त्यातून मला न विचारता तू पाणी घेत होतास, तर आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्यांची मला समाधानकारक उत्तरं दिलीस तर मी तुला पाणी घेऊ देईन, नाहीतर तू इथेच दगड होऊन पडशील.
     सहदेवाचा दगड बनतो.
     इकडे बराच वेळ झाला, सहदेव अजून कसा नाही आला, म्हणून त्याला शोधायला नकुल जातो. त्याचाही दगड बनतो. मग अर्जुन. मग भीम.
     सर्वांत शेवटी धर्मराज युधिष्ठिर तळ्यापाशी पोचतो. आपल्या भावांचे दगड बनलेले पाहतो, त्याच्याही समोर यक्ष प्रकट होऊन आपले यक्षप्रश्न मांडतो. तो सर्व संवाद सखोल तत्त्वज्ञानाचा आहे.
     त्यामध्ये यक्षानं युधिष्ठिराला विचारलेला एक प्रश्न आहे - जगातलं सर्वांत मोठं आश्चर्य कोणतं.
     युधिष्ठिराचं उत्तर आहे - प्रत्येक जण मर्त्य आहे हे माहीत असून, प्रत्येक जण आपण अमर असल्यासारखा वागतो.
     महाभारताच्या कहाणीतलं हे सत्य आजही खरं आहे.
     जगातलं सर्वांत मोठं आश्चर्य. आपल्या ऐहिक अमरत्वाचा आभास.
     या आभासातून बाहेर पडण्याचा प्रवास प्रत्येकाला स्वतंत्रपणे करावा लागतो. आपल्यालाही एक दिवशी जायचं आहे, हे प्रत्येकाला बौद्धिक पातळीला माहीत असतं. पण तो जाणीवेचा जिवंत भाग बनायला प्रत्येकालाच आपापल्या साक्षात्कारी क्षणांना सामोरं जावं लागतं. ते शब्दांत कितीही सांगितलं तरी अपुरंच आहे. आपल्याला आपापलाच अनुभव जाणिवेमध्ये स्थिर करावा लागतो.
     असे ऐहिक अमरत्वाचा आभास दूर करणारे अनेक तीव्र क्षण, या वर्षांत माझ्या वाट्याला आले.
     उदाहरणार्थ अशोक जैन यांचा मृत्यू. मराठीमधला राष्ट्रीय पातळीचा असामान्य पत्रकार. गेली अनेक वर्षं ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे पत्रकारितेपासून दूर होते. तरी पण आता ते गेले, आपल्याला कळणार्‍या जगात तरी परत न येण्यासाठी, न भेटण्यासाठी गेले. या घटनेला इतकी तीव्र अंतिमता आहे की ते आपल्या कळण्याच्या पलिकडचंच आहे. एक शेवटचा पूर्णविराम. स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अवतरणचिन्ह... वगैरे काही नाही. नवी वाक्यं निर्माण होण्याच्या सर्व शक्यता संपल्याच. पूर्णविराम.
     प्रकृती अस्वास्थ्याच्या काळातही अशोक जैन यांचं महाराष्ट्र, भारत आणि जगातल्या घटनांकडे बारीक लक्ष होतं. ज्या थोड्या वेळा गेल्या काही काळात भेटलो होतो तेंव्हा मला वाटलं होतं की ते मनातून अस्वस्थ, दु:खी आहेत. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतली ढासळती गुणवत्ता, कोसळणारं चारित्र्य, पेड न्यूज, भ्रष्टाचार, वशिलेबाजी - आता तर वाढत गेलेला - वाढवत नेलेला तीव्र जातीय द्वेष - उथळ आणि सनसनाटी बातमीदारी, अभ्यास आणि सखोलतेचा अभाव - इतकंच काय, बेसिक न्यायबुद्धीचा सुद्धा अभाव, बातम्यांना आलेलं इन्फोटेन्मेंटचं स्वरूप, सरकारी सवलती - उदा. १०% चे फ्लॅट - मिळवायला पत्रकारांची चाललेली धडपड - त्यासाठी राजकीय पुढार्‍यांपुढे लाळघोटेपणा - आणि आत्म्यासकट सर्व काही विकायची तयारी - हे सर्व त्यांना समजत होतं, म्हणून ते अस्वस्थ होते. त्यावर आत्ता तरी सर्व काही बघण्यापलिकडे आपण काही करू शकत नाही या एक प्रकारच्या हताश जाणिवेमुळे ते जास्तच अस्वस्थ होते.
     आपल्या सक्रीय पत्रकारितेच्या काळात त्यांनी उत्तम, अभ्यासू, नि:पक्षपाती, परखड पत्रकारितेचा आदर्श जगून दाखवला होता. दीर्घ काळ दिल्लीत वावरताना त्यांनी राजधानीतूनया सदरातून राष्ट्रीय दर्जाची पत्रकारिता, स्तंभलेखन यांचा वस्तुपाठ घालून दिला. भोवतीच्या घटनांवर बोचरं, तिरकस - पण शक्यतो निर्विष भाष्य कसं करावं ते कानोकानीसदरातून मांडलं.
     मराठीतले एक (माझ्या मते) सार्वकालिक असामान्य लेखक महेश एलकुंचवार. दिलीप पुरुषोत्तम चित्रे, विलास सारंग, दुर्गा भागवत यांच्याप्रमाणे कमी शब्दांत प्रचंड ब्रह्मांड मांडण्याची त्यांची शैली. त्यांनी लिहिलेली तीन नाटकं सलगपणे रंगमंचावर सादर करण्याचा प्रयोग दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीनं केला. ही त्रिनाट्यधारा तास चालली.
     त्यावर अशोक जैन यांनी सडकून, तिरकी, बोचरी, उपहासपूर्ण टीका केली होती.
     त्यानं व्यथित झालेले एलकुंचवार नागपूर भेटीत अशोक जैनना अशा अर्थाचं काही म्हणाले होते की तुमची एक कॉलमची मजा होते, पण त्या नादात नवे नवे प्रयोग मार खातील - मग नवे प्रयोग करायला कुणी पुढे येणार नाही. (एकोणीसशे पन्नाशीच्या दशकात चिं.त्र्यं.खानोलकरांच्या अजगरकादंबरीवर आचार्य अत्रेंनी अश्लील असल्याची टीका केली होती - अत्रेंनी! अश्लीलतेची!! पण त्या धक्क्यामुळे काही काळ खानोलकरांचं लेखनच थांबलं होतं.) महेश एलकुंचवारांच्या मुद्द्याचा अशोक जैन यांनी समंजसपणे विचार केला होता, हे मला माहीत आहे.
     आत्ताच्या राजकारणाकडे पाहिल्यावर यशवंतराव चव्हाण जसे संत ठरतात, तसं आत्ताच्या पत्रकारितेपुढे अशोक जैन संत ठरतात.
     आता ते गेले.
     मृत्यूच्या यक्षप्रश्नांपुढे सामाजिक जाणिवेचा एक अंश दगड बनला.
     अजून त्या धक्क्याशी जरा जुळवून घेतलं जातंय तोवर प्रमोद पागेदार गेल्याची बातमी आली. कॅन्सर. अरे पन्नाशी ही काय जाण्याची वेळ आहे का? पण जाण्याला अशी काही वेळ, वेळापत्रक असतं का? आणखी एक उत्तम पत्रकार. मी मंत्रालयात काम करताना यांच्याशी ऋणानुबंध जुळले. ते, मी सरकारी अधिकारी आणि प्रमोद पत्रकार असे न राहता माणूस म्हणून मैत्रीच्या पातळीवर पोचले. पुढे मी सरकारी नोकरी सोडली. प्रमोदनंही पत्रकारिता सोडल्यासारखीच होती. पत्रकारितेतल्या पतनाच्या अवाढव्य लोंढ्यामुळे अनेक संवेदनशील पत्रकार साईडलाईनला पडल्यासारखे झाले. त्यातला एक उत्तम पत्रकार - प्रमोद पागेदार.
     गेला.
     अशोक जैन, प्रमोद पागेदार अपापलं जगून तरी गेले. चारू देशपांडेनं पंख्याला टांगून आत्महत्त्या केली. चारू देशपांडे. श्री.ग.माजगावकरांच्या साप्ताहिक माणूसमधल्या लेखनापासून - म्हणजे १९७७-७८ आमची दोस्ती. काळापुढे टिकलेली. काळानं पारखून सिद्ध केलेली. चारूचं मराठी लेखन अत्यंत लालित्यपूर्ण होतं. इंग्लिश लेखनही तितकंच बांधेसूद. हसरा चारू भेटीगाठी गप्पांमध्ये मोकळा ढाकळा, काहीसा विस्कळित वाटायचा. पण त्यानं बातमी, भाष्य, ऑप्‌-एड, अँकर-पीस लिहिला की त्याच्या संक्षिप्त, अर्थपूर्ण, सूत्रबद्धतेपुढे थक्क व्हायला भाग पडायचं. इकॉनॉमिक टाईम्समध्ये चारू देशपांडेची बाय्लाईन दिसली की मी ती बातमी-भाष्य-लेख न चुकता वाचायचो. त्यानंही पुढे पत्रकारितेला वैतागून रामराम ठोकला होता. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत सद्प्रवृत्ती निराशेपोटी निवृत्त होताना पाहण्याची तीव्र वेदना माझ्या वाट्याला आलेलीच आहे. चारूनं उद्योगसमूहात जॉब धरलं. बहुदा तिथे घडलेल्या काही गोष्टींनी त्याला आत्महत्त्येकडे नेलं. कायम हसतमुख आणि उत्तम विनोदबुद्धी असलेला चारू आत्महत्त्या करेल हे कल्पनेपलिकडचं आहे. पण जून २०१ मध्ये मी तिबेटच्या दौर्‍यावर असताना टेक्नॉलॉजीच्या कृपेनं ही बातमी माझ्यापर्यंत पोचली. तिबेटी संस्कृतीचा चीनकडून चालू असलेला खून पाहात होतो. आणि मनाला दीर्घ काळ सतावणार्‍या समस्येशी संघर्ष करत होतो - अजूनही, आहे - की वर्तमान भारतीय संस्कृतीला आत्मनाशाची प्रेरणा झालेली आहे का.? तेंव्हा चारूच्या आत्महत्त्येची बातमी पोचली. टेक्नॉलॉजी आता वेदना सुद्धा जगाच्या कानाकोपर्‍यात कुठेही, पामीरच्या पठारावर, जगाच्या छपरावर - आपल्यापर्यंत एका क्लिक्‌ सरशी पोचवते. कळण्याच्या पलिकडचं आहे सगळं. अन्‌ तिथे दूर तिबेटमध्ये चारूच्या आत्महत्त्येचं काय करायचं न कळल्यामुळे आलेली तगमग अजून ताळ्यावर आलेली नाही.
     मराठीतल्या सिद्धहस्त लेखिका वीणा गवाणकर यांच्या घरी दुपारी चारू हसतखेळत, मजा करत जेवला, घरी गेला. ड्रायव्हरला म्हटला, थोड्या वेळात येतो, म्हणून वर गेला. तो वरच गेला. पंख्याला दोरी टांगून वर गेला.
     अस्तित्वाचं अंग दगड बनत जाणं काही संपत नाही.
     बेळगावचे एक आदर्श उद्योजक सुरेश हुंद्रे सर्व सरकारी भ्रष्टाचाराच्या नाकावर टिच्चून सरळच व्यवसाय करता येतो, वाढवता येतो - कोट्यवधींचा टर्न-ओव्हर पार करता येतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. त्यांची-माझी आता १८ वर्षांची जिवलग ओळख. जोडोनीया धन उत्तम वेव्हारे’ - असा व्यवसाय चालवून दाखवल्यावर बेळगावच्या रामकृष्ण मिशनचं काम करत उदास विचारे वेच करी’ - असं सुरेश हुंद्रे जगून दाखवत होते. त्यांच्या उद्योगाचं नाव पॉलिहॅड्रॉन’. आधी अन्य बहुसंख्य उद्योजकांप्रमाणे तेही उन्नीसबीस करत, पाकिटं पोचवत, सरकारी यंत्रणेशी जुळवून घेत व्यवसाय करत होते. इच्छा नाही, पण करावं लागतं, त्याशिवाय बिझिनेस चालवता येणार नाही - असं तत्त्वज्ञान त्यांनी उभं केलं होतं. वरिष्ठ पातळीचा एक एक्झिक्यूटिव्ह नेमण्यासाठी मुलाखत घेताना ते एका उमेदवाराला म्हणाले, नोकरी देतो - पण, समजा पगार पन्नास हजार दिला, तर सही एक लाखावर करावी लागेल, माझाही इलाज नाही. तो माणूस म्हणाला, भ्रष्टाचारानं मिळणारी तुमची नोकरी नको मला. सुरेश हुंद्रे म्हणाले, भ्रष्टाचार अटळ आहे. हा माणूस म्हणाला, आपण बदलू शकतो. सुरेश हुंद्रे म्हणाले, चल आपण बरोबरच बदलू. आणि खरंच बदलले. त्यांनी कामगारांना विश्वासात घेतलं. सरकारी पाकिटं बंद करून टाकली. सर्व खरे खरे हिशोब ठेवत टॅक्सेस्‌ प्रामाणिकपणे भरणं चालू केलं. आपण किती कोट्यवधींचे कर भरतो हे कंपनीच्या मुख्य पोर्चमध्ये भव्य फळ्यावर लावून ठेवलं. पाकिटाची अपेक्षा करत कोणी सरकारी अधिकारी आलाच तर त्याला तो फळा दाखवून, बाहेरचा रस्ता सुधरायला सांगितलं. देश-विदेशांत त्यांचे मोठे सन्मानही झाले. त्यांना विद्यार्थ्यांशी संवाद करायला बोलवायचं आमचं ठरलं होतं.
     तर आता काही काळापूर्वी, एका सकाळी ते उठले. आणि हार्ट अॅटॅकनं गेले.
     अशाच एका सकाळी प्रतिभावंत इंजिनियर मित्र माधव जोग उठला आणि ब्रेकफास्टच्या टेबलवर हार्ट अॅटॅकनं अचानक गेलाच.
     माधव जोग. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेची मूळ कल्पना त्याची. त्याच्या अभियांत्रिकी योजनेमध्ये हा मूळ महामार्ग पुण्यातून गेट-वे-ऑफ-इंडिया पर्यंत सरळ रेषेत होता - मध्ये आवश्यक ते पूल, बोगदे, कल्व्हर्ट वगैरे - पण लेनचा रस्ता सरळ. जागतिक दर्जाचा. तो व्यक्तिश: बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ होता. त्यानं ही योजना बाळासाहेबांना सांगितली. बाळासाहेबांनी तो १९९० च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप च्या निवडणूक जाहीरनाम्याचा भाग बनवला. १९९० ची विधानसभा निवडणूक सेना-भाजप नं जिंकली नाही. तर बाळासाहेबांनी मंत्रालयात मुख्यमंत्री शरद पवार यांच्याकडे ही योजना सुपूर्द केली. नंतर वर्षानुवर्षं रेंगाळत, चिकार राजकीय-प्रशासकीय विलंब, वगैरे होत आत्ताचा, मूळ योजनेपेक्षा खूप वेगळा - कमी कार्यक्षम एक्स्प्रेस वे तयार झाला. दरम्यान राजकारणाला वैतागलेला माधव उदासपणे सेनेपासून दूर होत, फक्त व्यवसायात रमायचा प्रयत्न करत राहिला.
     आणि असाच पन्नाशीमध्ये ब्रेकफास्टच्या टेबलवर अंतिमत: निर्णायक गेलाच.
     असा शाळेच्या दिवसांपासूनचा (१९६९) कार्यकर्ता मित्र विवेकानंद फडके. आम्ही त्याला भाईम्हणायचो. गेला.
     माझे IAS मधले चार बॅचमेट्‌स्‌. दोन हार्ट अॅटॅकनं, एक अपघातात - एकानं आत्महत्त्या केली. IAS/IPS इ... वरिष्ठ अधिकारी आत्महत्त्या कशी काय करतात?
     याला काही उत्तरच नाही. यक्षप्रश्न सगळे.

     मध्ये महाराष्ट्र आणि भारत सरकारमध्ये सर्वोच्च पातळ्यांवर काम करणार्‍या माझ्या IAS मित्रांना भेटायचं निमित्त झालं. मला वाटलं होतं करियरच्या शिखरावर असलेले हे मित्र शांत, प्रसन्न, आश्वस्त असतील. तर ते मला उदास अस्वस्थ दिसले. करियर आणि कदाचित आयुष्याचा अज्ञात शेवट जवळ आल्याच्या जाणीवेतून तलत मेहमूदनं गायलेल्या अंधे जहॉं के अंधे रास्ते । जाये तो जाये कहॉंया गजलमधली एक ओळ आहे ऐ गम के मारों मंजिल वही है । दम ये टूटे जहॉं’. मला वाटत आलंय की शेवटचा श्वास जिथे घेऊ तेच आपलं ध्येय आहे, या जाणिवेला दु:खद कशाला म्हणायचं. प्रवासाचा प्रत्येक क्षण अनमोल आहे. कुठे अमुक एका मुक्कामावर पोचायचंय असं नाहीच. शेवटचा श्वास जिथे घेतला जाईल, तोच आपला मुक्काम. तिथपर्यंतचा प्रवास तर आनंदानं करावा नं. आपली भारतीय संकल्पना आहे की माणसाचा जन्म मिळणं हे सद्भाग्य आहे. अंत झाला अस्ताआधी । जन्म एक व्याधीअसं आरती प्रभूंना का वाटलं हे आपण समजू शकतो, तरी पण व्याधीग्रस्त जन्म सुद्धा संधी आहे. अनमोल आहे. माणसाला मृत्यूची जाणीव झाल्यावरच प्रेम का आठवतं, हाही यक्षप्रश्नच आहे. पण जीवन आहे तोवर प्रसन्नपणे, अलिप्तपणे, सर्वांनाच शुभेच्छा देत, सर्वांशी प्रेमानं वागत जगण्याचा - प्रयत्न तरी करायला, काय हरकत आहे?