Sunday, November 24, 2013

नोबेल आणि भारतीय



... णि आपण सगळेच

लेखांक ८





सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य

नोबेल आणि भारतीय

जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, गतिमान व्हायला लागली. भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे याचा साक्षात्कार अमेरिकन, युरोपीय राष्ट्रांना व्हायला लागला आणि त्याच वेळी मिस्‌ युनिव्हर्स, मिस्‌ वर्ल्ड यासारखे सन्मान भारतीय तरुणींना मिळायला लागले, हा केवळ योगायोग नव्हता. मार्केटशी त्याचा थेट संबंध होता आणि आहे. पण ज्या क्षेत्राचा मार्केटशी संबंध नाही तिथं मात्र प्रतिभावंत, क्षमतापूर्ण संशोधक असलेल्या भारतीयांना सी.व्ही.रामन्‌ यांच्यानंतरचं एकही नोबेल पारितोषिक मिळू नये, याला तरी योगायोग कसा म्हणायचा? नोबेल पुरस्कार निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा कुठं तरी राजकारण असेल का असाच प्रश्न त्यामुळे उपस्थित होऊ शकतो.
     खरं तर महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार मिळायलाच हवा होता (अर्थात ते त्याच्यापेक्षा मोठे आहेत, हे मान्य करूनही). तीनदा त्यांचं नावही त्यासाठी पुढे आलं होतं. मात्र त्यांना हा सन्मान आम्ही देऊ शकलो नाही, ही आमची चूकच झाली असं नोबेल समितीनं कबूल करून ठेवलंय हेही काही कमी नाही अशी आजची परिस्थिती दिसते. मदर तेरेसांना हा सन्मान मिळाला ते योग्यच झालं. पण मग बाबा आमटेंना, पांडुरंगशास्त्री आठवले, सत्यनारायण गोयंका किंवा श्री श्री रविशंकर यांना का नाही हाही प्रश्न मनात येतोच. पंडित नेहरूंच्या धोरणांबद्दल, विचार आणि कृतीबद्दल अनेकांचे काही आक्षेप असतील, पण प्रसंगी भारताच्या राष्ट्रीय हिताचं बलिदान देऊन त्यांनी जागतिक शांततेसाठी शांतीदूतम्हणून जे प्रयत्न केले, ते नोबेल सन्मान मिळवण्याच्या तोडीचे नव्हते का असंही राहून राहून वाटतं. मूळच्या भारतीय असलेल्या डॉ. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्राचं नोबेल दिलं जातं, पण मग जगदीश भगवतींना का नाही, असं वाटतं.
     केवळ विज्ञान, अर्थशास्त्र, राजकारण, सेवा कार्य, जागतिक शांतता एवढ्यापुरतंच नाही, पण साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी तरी भारताचा कुठे विचार केला जातो? कादंबरीच्या क्षेत्रात इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, रशियन इतकी ताकद आपल्या मराठी साहित्याच्या कादंबरी प्रांतात नाही हे वास्तव असूनही मृत्युंजयला नोबेल मिळू नये ही खंत सलतच राहते. मराठी काव्य आणि लघुकथा हा साहित्यप्रकार खरोखरच जागतिक दर्जाचा नाही काय?
     म्हणजे नोबेल पुरस्कारासाठी निवड होताना नक्कीच राजकारणहोतंय आणि त्यात भारताचा कुठेच विचार होत नाही हा मुद्दा मान्य करूनही आत्मपरीक्षणाच्या मार्गानं आपण जायचं ठरवलं, निदान विज्ञान क्षेत्रापुरतं, तरी हे आपल्याला मान्यच करावं लागेल की या क्षेत्रातही सर्व पातळ्यांवर आपल्याला अभावच दिसून येतो. नवा विचार कर, तुझा स्वत:चा विचार मांडहे आपण मुला-मुलींना कुठे सांगतो? शिक्षणापासून सगळीकडेच आपण त्यांना सांगतो, ‘आम्ही सांगतो तेवढंच कर. मार्क आणि परीक्षेपुरतं, सीईटी आणि कॅम्पस्‌ इंटरव्ह्यूपुरतंच कर.
     क्वांटम मेकॅनिक्सचा निर्माता म्हणून ओळखला जाणारा नील्स बोर. एका उंचीवरून दगड फेकला जाईल, तेव्हा त्याचं भौतिकशास्त्रीय सूत्र लिहाअसं त्याच्यासह वर्गातल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी सांगितलं. त्यानं प्रस्थापित पद्धतीपेक्षा नवे प्रकार शोधून काढले. त्याला बक्षिस मिळालं. आपल्याकडे काय होईल? डॉ. जयंत नारळीकरांनी वेगवेगळ्या प्रकारे गणित सोडवलं तर त्यांना सांगण्यात येतं की हे सगळं चांगलं आहे, पण परीक्षेत सध्या सांगितलेल्या पद्धतीनं न सोडवता हे नव्या पद्धतीनं सोडवलेलं गणित कदाचित तपासणार्‍यांनाच समजलं नाही, तर तुझे मार्क जातील. संशोधन वृत्तीच आपल्या शिक्षणातून, व्यवस्थेतून मारली जाते.
     भारतात राहून ज्यांनी संशोधनाची तपश्चर्या केली त्यांना इथं असताना नोबेल पुरस्कार कधीच मिळाला नाही. विज्ञानाच्या बाबतीत म्हणायचं तर सी.व्ही.रामन्‌ यांचा अपवादच म्हणावा लागेल. हरगोविंद खुराणा यांचंच उदाहरण पाहा. ते आधी भारतातच होते. पण इथल्या सगळ्या त्रासाला वैतागून ते अमेरिकेत गेले. त्यांच्या संशोधनाला नोबेल मिळालं. सी.व्ही.रामन्‌ यांचेच पुतणे असलेले सुब्रह्मण्यम्‌ चंद्रशेखर भारतातच संशोधन करत होते. शिष्यवृत्ती मिळाल्यावर जहाजातून लंडनला जाताना विचार करायला लागले. ब्लॅक होल’ - कृष्णविवरची संकल्पना पहिल्यांदा त्यांनी मांडली. केंब्रिजमध्ये संशोधन प्रबंध सादर केले.
     म्हणजे अगदी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातही आपल्या भारतीय मानसिकतेमधली गुलामगिरीची जाणीव आजही तितकीशी कमी होताना आपल्याला दिसत नाही. वैज्ञानिक सत्यसिद्ध करू पाहणारी व्यक्ती कोणत्या देशाची आहे, वंशाची आहे, गोरी की काळी, महिला की पुरुष, लहान वयाची की ज्येष्ठ... असा कोणताच भेदभाव खरंतर असता कामा नये. पण आपल्याकडे असं दिसत नाही.
     हिटलर बॉम्ब तयार करत असल्याचं आईनस्टाईनना माहीत होतं. ते अमेरिकेत गेले. न्यू मेक्सिको इथल्या प्रयोगशाळेत अणुबॉम्ब तयार करण्याच्या मॅनहॅटन प्रोजेक्टचे ते सल्लागार बनले. वेळा नोबेल सन्मान मिळालेले हे संशोधक. पण त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांच्यापेक्षा वयानं, कर्तृत्वानं कितीतरी लहान असलेल्या रिचर्ड फेनमानना बोलावून घेऊन आईनस्टाईन त्यांच्याशी गप्पा मारत असत. १९४१-४३ हा दुसर्‍या महायुद्धाचा काळ. आईनस्टाईन त्यावेळी ५२/५३ वर्षांचे असतील तर फेनमान १९/२० वर्षांचे. त्यावेळी एकदा फेनमाननं जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ असलेल्या आईनस्टाईनना विचारलं की, मी एवढा वयानं, कर्तृत्वानं, अनुभवानं तुमच्यापेक्षा लहान असूनही तुम्ही इतके माझ्याशी कसे गप्पा मारता? त्यावर आईनस्टाईननं दिलेलं उत्तर आपल्याला केवढं तरी शिकवून जाईल. ते म्हणाले, ‘माझं वय, अनुभव वगैरे बाजूला ठेवून तर माझ्यासमोर तुला जे पटतं ते सत्य तू बोलतोस याचं मी स्वागत करतो.हाच प्रसंग आपल्याकडे असा कधी घडेल का? आपल्याकडची याबाबतची परंपरा घातक आहे. सत्येंद्रनाथ बोस - भारतातले एक महान शास्त्रज्ञ. त्यांना नोबेल मिळायलाच हवं होतं. त्यांचं संशोधन पुढे नेणार्‍यांना ते नुकतंच जाहीर झालंय. पण त्यांच्या हयातीत त्यांना मिळालं नाही. ते बोस आपली संशोधनाशी संबंधित कागदपत्रं थेट आईनस्टाईनकडे पाठवायचे. जगभरातून अशा असंख्य जणांची कागदपत्रं आईनस्टाईननं तपासून द्यावीत म्हणून येत असत. त्यावेळी आईनस्टाईनना इंग्रजी येत नव्हतं. तरी काही महत्त्वाची कागदपत्रं निवडून, ती जर्मनमध्ये भाषांतरित करून घेऊन आईनस्टाईन ती कागदपत्रं तपासत असत. आपल्या क्षेत्रातल्या जगभरातल्या लोकांशी त्यांचा असा संपर्क होता. बोस यांच्या संशोधनाला त्यांनी उचलून धरलं आणि जगभर ते प्रख्यात झालं.
     श्रीनिवास रामानुजन्‌ यांच्यासारख्या महान गणितज्ञाला कुठे नोबेल मिळालं? त्यापुढे जाऊन पाहिलं तर आजही नट-नट्या आणि क्रिकेटरच बर्‍याच वेळेला आपल्या तरुण-तरुणींचे आदर्श किंवा रोल-मॉडेल्सअसतात. आत्ता आत्ता काही शास्त्रज्ञांची नावं रोल मॉडेल्स म्हणून तरुण पिढीच्या तोंडी यायला लागली आहेत. पण सामाजिक आणि करियरच्या पातळीवर शास्त्रज्ञ, संशोधन, विज्ञान याबाबत काय समज आहे? एखादा युवक-युवती जर मला विज्ञान-संशोधन क्षेत्रात करियर करायचंय, म्हणायला लागली तर पालकांच्या प्रतिक्रिया काय असतील, याची कल्पनाच केलेली बरी. संशोधनाची सुसंगत परंपरा, त्याला व्यासपीठ, शिक्षणव्यवस्थेमध्ये याकरता पोषक वातावरण हे फारसं आपल्याकडे दिसत नाही. किती प्राध्यापक आपापल्या विषयात संशोधन करून राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले पेपर्स पाठवतात? उलट असं काही करणार्‍या माणसांचं खच्चीकरण करण्याची परंपराच आपल्याकडे अधिक!
     व्ही.पी.सिं, होय, अगदी बरोबर नाव आहे हे. याच नावाचा एक अफाट माणूस पाटणा विद्यापीठात गणिताचा प्राध्यापक म्हणून काम करत होता. रामानुजन्‌ यांची परंपरा पुढे नेणारे प्राध्यापक म्हणून सिंग यांची ख्याती होती. १९७० च्या दशकातली ही घटना. आपल्या बुद्धिमत्तेमुळे, गणितातल्या प्रतिभेमुळे ज्याचं कौतुक होत असे, त्याच प्राध्यापकाच्या खच्चीकरणाचेही प्रयत्न इथल्या व्यवस्थेत सुरू झाले. त्यातून सिंग डिप्रेशनमध्ये गेले. त्यांची नोकरीही गेली. इतकंच काय, त्यांची बायकोही त्यांना सोडून गेली. पाटणा हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट करावं लागलं. पण अधूनमधून त्यांचं स्वत:वरचं नियंत्रण कमी व्हायला लागलं. ते हॉस्पिटलमधून पळून गेले. दरम्यानच्या काळात सुमारे २० वर्षं ते बेपत्ता होते. नंतर एकदा बंगलोरच्या रेल्वे स्टेशनवर भीक मागताना त्यांच्या भावाच्या मित्राला ते दिसले. त्या मित्राला हा माणूस ओळखीचा वाटला, थोडा वेगळाही वाटला. भीक मागतानाच समोर पाटी-पेन्सिलीनं काही आकडेमोड करणार्‍या या माणसाकडे कॉलेजमधली काही मुलं येऊन गणितातल्या शंका विचारत होती - हे चित्र पाहून त्या मित्राला धक्काच बसला. सिंग यांनीही आपल्या भावाच्या या मित्राला ओळखलं. पुढे सिंग यांच्या भावानं त्यांना बंगलोरहून हलवलं. अनेक उपचार केले. तब्येत नीट केली. पण व्ही.पी.सिंग नावाच्या या प्रचंड बुद्धिमान प्राध्यापकातला गणितज्ञ मेला तो मेलाच... कायमचा. आपल्याकडच्या क्षुद्र राजकारणामुळे किती मोठं नुकसान झालंय... आजही होतंय.
     खुराणा, सुब्रह्मण्यम्‌ चंद्रशेखर यांना भारताबाहेर गेल्यावरच नोबेल कसं मिळतं? आपल्याकडे बुद्धिमत्ता मारण्याचा उद्योग अनेक पातळ्यांवर सुरू असतो. सी.व्ही.रामन्‌ हे मात्र या सगळ्याला अपवाद ठरले एवढं नक्की.
     बंगलोरमध्येच सर विश्वेश्वरैय्या इन्स्टिट्यूट आहे. १९७० च्या दरम्यान एकदा मी तिथलं संग्रहालय पाहायला गेलो होतो. मुलांना आवडतील, मुलं रमतील असे विज्ञानविषयक अनेक खेळ तिथे मांडलेले होते. फारच छान होतं ते संग्रहालय. बंगलोरमध्ये होणारी हवाई दलाची प्रात्यक्षिकं दाखवायला माझ्या मुलाला घेऊन मी गेल्या वर्षी तिथे गेलेलो असताना विचार केला की ते संग्रहालयही मुलाला दाखवावं. २५ वर्षांपूर्वी पाहिलेलं ते संग्रहालय आता काळानुसार अधिक चांगलं झालेलं असेल असं वाटत होतं. पाहिलं तर सगळंच बदललेलं होतं, पण दुरवस्थाच बघायला मिळाली. अगदी दुर्दशा म्हणावी इतकी वाईट परिस्थिती दिसली. आपल्याकडे अशा एखाद्या उपक्रमाचं संस्थाकरण फारसं चांगलं होत नाही. झालं तर टिकत नाही, त्याची चळवळ होत नाही. दुर्दैवानं ते कार्य व्यक्तिसापेक्ष राहतं.
     शिक्षण नाविन्याचा आग्रह धरत नाही. इथं आव्हानांचं स्वागत केलं जात नाही. खरं तर वेदोपनिषदं पाहा. आपली परंपरा वेगळी आहे. गुरुला शिष्य प्रश्न विचारतो आणि त्याला दिलेल्या उत्तरातून हे तत्त्वज्ञान पुढे मांडलं जातं. चांगल्या भूतकाळाशी असलेला धागाच आपण आज तोडलाय. यासाठी शिक्षण, परीक्षापद्धतीमध्येच काही मूलभूत बदल करावे लागतील.
     जपानमध्ये मी पाहिलंय की प्राथमिक शिक्षणापासून ते पीएच्‌.डी.पर्यंतचं शिक्षण तिथे मातृभाषेतून दिलं जातं. चीन, तिबेटमध्येही हेच चित्र पाहायला मिळालं.
     अलिकडेच घडलेला एक प्रसंग मला आठवतोय. ग्वांगझू हे तिबेटमधलं एक ठिकाण. खूप उंचीवर असल्यानं तिथे अपुर्‍या ऑक्सिजनअभावी माझ्या पत्नीला त्रास व्हायला लागला. पहाटे हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. अत्यंत उच्च दर्जाचं ते हॉस्पिटल भल्या पहाटे कार्यरत होतं. तिथल्या दोन तिबेटी डॉक्टर युवतींना इंग्रजी येत नव्हतं. त्या तिबेटीतूनच बोलत होत्या. आमच्या गाईडला अनुवादकाची भूमिका करावी लागली. एवढ्याशा तिबेटमध्येही मेडिकलसारखं शिक्षणसुद्धा मातृभाषेत मिळतं, हे पाहून आश्चर्य वाटलं.
     आपल्याकडे हे घडेल का? विज्ञानातलं मूलभूत संशोधन करायला उपयुक्त वातावरण हवं. ते आपल्याकडे नाही. पर्यायी पारिभाषिक असे भारतीय शब्द शोधून विज्ञान आपल्याला मातृभाषेत आणायचं असेल तर मुळात त्या भाषेवर आपलं प्रभुत्व हवं. ते पाहिजे असेल तर मुळात या भाषांची जननी असलेल्या संस्कृतवर प्रभुत्व हवं. कारण ब्लॅक होलला कृष्णविवरहा पर्यायी शब्द संस्कृतमधूनच आला. डाव्या विचारांचा मानला जाणारा हॉर्वर्ड विद्यापीठातला भाषाशास्त्रज्ञ नॉम चॉम्स्की म्हणतो, भाषाशास्त्राच्या दृष्टीनं जगातली सर्वांत चांगली भाषा म्हणजे संस्कृत. आता तर संगणकाला सर्वांत जवळची भाषा म्हणून संगणकतज्ज्ञ तिचं महत्त्व जाणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तर संस्कृतला भारताची राष्ट्रभाषा म्हणून मान्यता द्यावी असं नमूद केलंय. तथाकथित उजव्या मंडळींची भाषा म्हणून आपण संस्कृतबद्दल नकारात्मक भूमिका घेतो. त्यात आपलं राष्ट्रीय नुकसान किती आहे हे आपण पाहातच नाही. शिवाजी महाराजांनी राज्यकारभारातलं फार्सीचं महत्त्व मोडून काढलं होतं. एकप्रकारे भाषाशुद्धीची चळवळ होती ती. नव्यानं त्यांनी राज्यव्यवहारकोषतयार केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर संस्कृतच्या अभ्यासामुळे अनेक मूलभूत प्रतिशब्द  मराठीला दिले. आज आपण सावरकरांनाच दुर्लक्षित करतो, मग त्यांच्या भाषाशुद्धीकडे कोण लक्ष देणार? संस्कृतशी नातं तोडून आपण इंग्रजीचे भाषिक गुलाम झालोत.
     आपली भाषा, संस्कृती, उच्च बौद्धिक परंपरा, त्यागभावना, तपश्चर्या, ज्ञानसंपादनाची मूलभूत साधनं या सगळ्यांचाच आपल्याला विसर पडला आहे. आपल्या मातीशी, विचारांशी, भाषेशी आपली नाळ तुटलेली आहे. अशा परिस्थितीत स्वहरवून बसलेल्या भारतीयांना भारतात राहून नोबेल पुरस्कार मिळावा हे स्वप्नच ठरू शकतं. या मूलभूत प्रश्नांना, उणिवांना आणि त्या दूर करण्याच्या प्रक्रियेला आपण भिडलो तरच हे शक्य आहे. तरच नोबेलही भारतीयांची परंपरा होऊ शकेल.

5 comments:

  1. Thanx sir..if i pass compliment about blog its not well..coz all are knows u deserve all kind of compliment ...and i also think i am not as big as u to give complement...i just want to say thanx for giving information and share your opinion with us.......thanx for blogs & FB sharing wid us.

    ReplyDelete
  2. अविनाशजी,
    आपल्या लेखाबद्दल धन्यवाद.
    माझ्या निरीक्षणानुसार, कोर्पोरेट क्षेत्र म्हणजे सर्वस्व असा वाटण्याच्या फेज मधून आपण हळू हळू बाहेर येतोय. मुलभुत संशोधन, इतिहास-संशोधन, भाषा संशोधन इत्यादी fundamental गोष्टींवर भर देण्याचा विचार अनेक वेगवेगळ्या माध्यमांतून मांडला जातोय. अश्या विषयांवर समाजात सतत चर्चा झडल्या पाहिजेत जेणेकरून समाजमन तयार होऊन बदलाच्या दिशेने आपण एक पाउल पुढे टाकू.

    ReplyDelete
  3. मला इथे सांगावस वाटत की नोबेल शांतता पुरस्कारांबाबत कदाचित राजकारण होण्याचा संभव आहे.पण, तेही काही विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावामुळे तेसुद्धा काहीच बाबतीत.पण, तस करतानाही नोबेलने आपल्या निवड पद्धतीना तिलांजली दिलेली नाही.पण, शांतता सोडता इतर क्षेत्रातील नोबेल पुरस्कार हे सुयोग्य व्यक्तींनाच दिलेले आहेत.एखादी व्यक्ती गाळली गेली असेल पण, चुकीच्या व्यक्तींना कधीच हा पुरस्कार मिळाला नाही.जगातील काही मोजक्या परंपरा ज्या खऱ्या अर्थाने वैश्विक आहेत त्यातील ही एक.मुळात नोबेल बाबतही आपण भारत वगैरे असे संकुचित विचार का करतो ? ह्यात देशभक्ती वगैरे बाजूला ठेवूयात ना जरा.टागोर असोत किंवा रामकृष्ण किंवा अमर्त्य सेन यांच काम हे वैश्विक हिताच होत त्याला देशभक्तीच्या संकुचित चौकटीत बसवण हास्यास्पद आहे.त्यामुळे भारतीयांना नोबेल का नाही हा वादच मुळात हास्यास्पद आहे. अप्रस्तुत आहे.
    उरता उरला प्रश्न वैज्ञानिक प्रवृत्तीचा.फेंगशुई, वास्तुशास्त्र, ज्योतिष तसेच पुराणातील कथा यांचा वैज्ञानिक प्रगतीशी असंबद्ध संबंध जोडणाऱ्या आणि त्याच समर्थन करणाऱ्या आपण भारतीयांनी संशोधनाच्या फुशारक्या मारण बंद कराव.ज्या देशात पद्म पुरस्कारही विकत मिळतात त्यांनी दुसऱ्या देशातल्या परंपरांना नाव ठेवण्यात काय हशील.मुळात भारतीय समाजाकडे काही कर्तुत्व, उद्यमशीलता उरली नसल्याने उठसुठ आपण पुराण, वेद यांचे दाखले देतो.अस का ? तेव्हापासून आजपर्यंत आपण काय करत होतो.असो यावर खूप बोलता येईल.

    ReplyDelete
  4. गांधी आफ्रिकेतच राहिले असते तर त्यांना नोबेल हि मिळाले असते व भारताचेही भले झाले असते . दोघांचाही फायदा झाला असता . उगाच टी व्यक्ती भारतात आली . चरखा चला चला के आझादी द्यायला

    ReplyDelete
  5. वैभव 1446 आपण काय बोलताय ते समजतय का ऊगाच भारतात आले म्हणे चरख्याच्या बाहेर पडुन पहा जरा डबक्यातुन बाहेर पडा
    गांधी येण्याआधी स्वातंत्रयलढ्यात किती जण होते
    आणि ते कोट्यावधी कसे झाले विचार करा

    ReplyDelete