Tuesday, January 1, 2013

श्रद्धांजली



    अखेर सुटली ती. मृत्यूच्या महामार्गावरून मुक्‍तीला मिळाली. सुटली सर्व यातनांमधून. मुक्‍तीचा जणू तेवढाच मार्ग शिल्लक होता तिच्यासाठी.
    परत आली असती, वाचली असती तर काय करती? आणखी एक अरुणा शानभाग? पाच सहा जणांनी चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्‍कार करून फेकून दिल्यावरही तिच्या यातना संपल्या नव्हत्या. हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेला होता. मेंदूमध्ये पाणी झालं होतं. काळजाचं तर पाणी पाणी होऊन केव्हाच उडून गेलं होतं. साहजिकच अवयव निकामी होत चालले होते. तिला व्हेंटिलेटरवर जिवंत ठेवलं होतं. म्हणजे समोर ३७ वर्षांपूर्वीच उद्‍घाटन झालेला अरुणा शानभाग मार्गच दिसत होता.
    सुटली. परत कोणा कंसाच्या हातून दगडावर आपटून मरण्यापूर्वीच त्याच्या हातून निसटून आणखी एक ’रोहिणी आकाशाला मिळाली’. ’तुझा वध करणारा कृष्ण गोकुळामध्ये वाढतोय’ असं सांगून गेली की नाही, काही कळायला मार्ग नाही, सिंगापूरमधल्या डॉक्‍टरना विचारायला हवं. सुटलीच म्हणायची.
    जरी पूर्ण बरी झाली असती तरी तिच्यासमोर काय मार्ग होता? सन्मानानं परत संपूर्ण माणूस म्हणून जगण्याचा मार्ग खरंच होता आजच्या समाजव्यवस्थेत? का नामरूप बदलून दिवाभीतासारखं स्वतःपासूनच स्वतःला लपवत आयुष्य जगणं शक्य होतं? का सोनागाछी, कामाठीपुरा, पीला हाऊस वगैरे शाश्‍वत संस्थांची आजीवन सदस्य होऊन जगणार होती ती? सर्व संस्कृतीच्या संवेदनांना तिच्यामुळे एवढा वर्मी फटका बसलाय की कदाचित तिची वैयक्तिक कहाणी वेगळी झालीही असती. पण अशा हजारो स्त्रिया तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतायत अन्‌ शेवटी अगदीच सहन झाला नाही तर विहीर, पंखा, स्टोव्ह, वीष जवळ करतायत, त्यांचं काय?
    पण एवढं हताश होण्याचंही कारण नाही. तिच्यासमोर आणखी एक रस्ता होता, मुख्तार माई आणि भंवरी देवीनं आखलेला.
    मुख्तार माई. काय नाव आहे. बलुचिस्तानमधली शेजार शेजारची दोन गाव दोन टोळ्या. दुसरं गाव जास्त पॉवरफुल. त्या गावातल्या मुलीचा मुख्तार माईच्या भावावर डोळा होता, त्यानं नकार दिला, तर तिनं त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला. जातपंचायत बसली आणि निकाल केला गेला की गुन्हा शाबीत, शिक्षा : मुख्तार माईला भर गावात, सर्वांसमोर तिच्यावर सामूहिक बलात्‍कार. शिक्षेची अंमलबजावणी सुद्धा झाली. शरमेनं जिणं नको झालेली मुख्तार माई आत्‍महत्या करायच्या टोकावर पोचली. पण त्या टोकावर तिच्या डोक्यात विचार आला मी काय गुन्हा केला म्हणून मी मरायचं. लढण्याच्या जिद्दीनं ती परतली. बुरसटलेल्या पाकिस्तानी समाजव्यवस्थेत जी विचारी, प्रगल्भ ’माणसं’ होती त्यांनी तिची कहाणी फ्रेंच पत्रकारांद्वारा जगासमोर आणली. आणि उसळलेल्या माणुसकीच्या आवाजासमोर पाकिस्तानचे प्रेसिडेंट परवेझ मुशर्रफना झुकावं लागलं. मुख्तार माई स्त्रीवरच्या अन्यायाविरुद्धच्या लढाईचा वैश्‍विक चेहरा बनली.
    याआधी अशीच कहाणी, थोड्या वेगळ्या तपशिलानिशी भंवरीदेवीची. राजस्थानमधली साथिन. बालविवाहाच्या अमानुष आणि बेकायदेशीर प्रथेचा विरोध करत होती. तिला सामूहिक बलात्‍काराला सामोरं जावं लागलं. ती सुद्धा आत्‍महत्येच्या उंबरठ्यावरून परतली. ही २३ वर्षांची मेडिकल विद्यार्थिनी परतली असती तर मुख्तार माई, भंवरी देवींना आणखी एक साथिन लाभून स्त्री ’विश्‍वाचे आर्त’ सांगू शकली असती.
    कुणी तिला नाव ठेवलं दामिनी, कुणी अमानत, तर कुणी निर्भया. कुणी अशीही नावं ठेवली की रात्री ९ नंतर फिरतेच कशाला? कुणी म्हणालं टाळी काही एका हातानं वाजत नसते. (त्या वृत्तीतलं क्रौर्य त्यांना समजलं तरी खूप झालं!) समाजाच्या संवेदनांपासून तुटलेल्या उर्मट राजकारणाचं रूप असलेले राष्ट्रपतीपुत्र - खासदार बरळले की लिपस्टिक लावलेल्या स्त्रिया हातात मेणबत्त्या घेऊन प्रसिद्धीसाठी मिरवतायत. अक्कल ठिकाणावर असेल तर राजकीय व्यवस्थेला समाजाला हवं की समाज शांततामय, अहिंसक मार्गानं आपली वेदना ’व्यवस्थे’पर्यंत पोचवायचा प्रयत्‍न करतोय. पण दोन नंबरचा पैसा, मसल्‌ पॉवर आणि जातीपातींच्या आणि घराणेशाहीच्या राजकारणावर पोसलेल्या उर्मट आणि जाड कातडीला मेणबत्तीची धग कुठून जाणवणार हो? तर कुणाची वेळ मारून नेणारी अक्कल चालू राहिली की बसेसना काळ्या काचा नकोत, कायदा कडक करू - असलेल्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करत नाहीत - पण असाच धूळ खात पडायला आणखी एक कायदा करू. लोकपाल विधेयक संमत करायला संसदेला वेळ होत नाही (भ्रष्टाचार हाही समाजावर होत असलेला सामूहिक बलात्‍कारच आहे.) पण आणखी एक कायदा करू. अरे कायदा स्त्रीच्या बाजूनी आहेच आत्ता सुद्धा. पण अंमलबजावणी केली तर! ती न करता नवे कायदे करू ही म्हणणं चक्क ढोंग आहे. मुळात हा प्रश्‍न केवळ कायद्याचा नाही, संस्कारांचा आहे.  कुणी म्हणालं तिलाच कळायला हवं की पुरुषाची वासना चाळवणारी वेशभूषा करू नये. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत पूर्वीच खुरटलेल्या त्यांच्या ’रेप्टाईल्‌’ मेंदूना हे समजतच नाही की काय वेश करावा हे ठरवायचं तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि तिनं काय वेश केला किंवा केला नाही म्हणून तिच्यावर बलात्‍कार करण्याचा अधिकार किंवा समर्थन कुणीही दिलेलं नाही.
    १६ डिसेंबर हा बांगला देश मुक्‍तीचा दिवस आहे. १९७१ मध्ये भारतीय सैन्यानं विसाव्या शतकातली सर्वांत वेगवान, सर्वांत यशस्वी लष्करी कारवाई करून बांगला देश पाकिस्तानच्या अत्याचाराच्या, बलात्‍कारांच्या पकडीतून मुक्‍त केला. त्या १६ डिसेंबरला ऐन राजधानीतच या सहा हरामखोरांनी देशाला कलंक लावला. आता तिचा मृत्यू झाला. म्हणजे या सहा जणांवर खुनाचाही आरोप ठेवता येईल. नुसताच बलात्काराचा आरोप सिद्ध झाला तर सात वर्षाचा सश्रम करावासानंतर सुटका होऊ शकली असती, नवे बलात्कार करायला! आता खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्यावर निदान तत्त्वतः तरी फाशीची शिक्षा होऊ शकते. पुढे प्रतिभाताईंप्रमाणे प्रेमळ प्रेसिडेंट असले तर ते राष्ट्रपतींचा अधिकार वापरून दयेचा अर्ज संमत करू शकतील, ती पुढची गोष्ट पुढे. त्यांना अफजल गुरुबाबत निर्णय घ्यायला वेळ होत नाही, पण बलात्कार्‍यांची शिक्षा माफ करायला होतो. भारत एक सहिष्णु, सौम्य देश आहेच मुळी!
    विज्ञानामध्ये ’कॉम्प्लेक्सिटी थियरी’ नावाचा सिद्धांत सांगितला जातो. त्यानुसार एखाद्या ’व्यवस्थे’ मध्ये ’घटना’ घडत रहातात, त्यानं फारसा फरक पडताना दिसत नाही, ’व्यवस्थे’ची रचना सर्व घटनांना सामावून घेत आपल्या मूळ ’इक्विलिब्रियम’ वर स्थिर रहाते. आणि मग एकच कोणती तरी निर्णायक ’घटना’ घडते  आणि संपूर्ण ’व्यवस्था’च धसते, कोसळते. तिच्या ’क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन’ मधून नवी ’व्यवस्था’, नवा समतोल आकाराला येतो. हा सिद्धांत राजकीय, सामाजिक व्यवस्थेलाही लागू पडू शकतो. खरंच तसं झालं आणि राजकीय, सामाजिक ’व्यवस्थे’त मुळातूनच बदल होऊन नवा समतोल स्थापित होण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर तिचं ’बलिदान’ सार्थकी लागेल. आणि ’व्यवस्था’ बदलायची तेव्हा बदलू दे, आपण सगळेच बदलाची सुरुवात स्वतःपासून केली, तर निदान तिला श्रद्धांजली तरी नीट अर्पण करू. (नाहीतर सगळंच ढोंग आहे.)

4 comments:

  1. Gandhijini jo paaya ghaalun dila aahe aapana sarva Bhartiyana - shantatamay nidarshane karanyacha ani aapli mate mandanyacha to ya jaad katadichya raajkaarnyana kadhi kalnar kunas thauk. Tya avichari lokana fakt dainted ani painted womencha distil they can not see good men & women in them.

    ReplyDelete
  2. This bestial act has shocked, hurt and numbed our senses. These horrendous reports of rapes with alarmingly high numbers is disturbing. It's a shame for us as Indians and a society as a whole that women in our country are not safe. Sir , was moving the victim to Singapore the only option? Was it medically advisable? And are our medical facilities,doctors and infrastructure incapable of treating such victims?

    ReplyDelete
  3. Abhishek NampalliwarJanuary 4, 2013 at 2:51 PM

    sir,,sharirane balatkar karnaryanvar kayde aahet.....pan najrene balatkar karnaryanchi jat suddha ethe aahech...jas aapan mhanata tase mahan sanskrutichi mulye visarat chalalelya aani najrene balatkar karnarya "tya" samajala naitikteche dhade dene aavashyak aahe..

    ReplyDelete
  4. Lokk mhantat tine aaple pran sodle tar bare zale nahitar tila jagn kadhin zaal ast,ashya vichar sarnicha samaaj aahe ethe.

    balatkar zalyavar rastyavar feklelya mulila police yeyi paryant madat karaychi nahi aani nantar ticya justice sathi nare karnara samaaj aahe ethe.

    jyala 5 varshe shivya ghaltat tyanach nivadnukit jinkun denara samaaj aahe ethe.

    mitranno aata parivartnachi garaj aahe, te tumhi aamhich ghadvun aanu shakto mhanun swatha badala , aaple vichar badla.

    ReplyDelete