कार्यकर्ता अधिकारी – भाग 7
तसा एकूण प्रशिक्षण कालावधी आणि त्यातही मसुरीचे दिवस मी भरपूर ‘एन्जॉय’ केले. त्यावेळी आमच्या बॅचच्या थोडं आधीअॅकॅडमीतच्या जुन्या शैलीतल्या लाकडी इमारती आगीत भस्मसात झाल्या होत्या. त्यामुळे सगळ्याच व्यवस्थांमध्ये एक तात्पुरतेपणा होता. अभ्यास विषयांची मुख्य मार्गदर्शन सत्रं ‘सरदार पटेल हॉल’ (SPH) मध्ये व्हायची - तिथे लोखंडी, फोल्डिंगच्या बर्याच गंजलेल्या खुर्च्या होत्या - पण समोर चाललेल्या एकाहून एक सखोल सत्रांमुळे गंजलेल्या खुर्च्यांचा विसर पडायचा. (खुर्च्यांना गंज चढू नये म्हणून काळजी करतोयस तसा मानालाही गंज चढू नये म्हणून काळजी कर हो शाम!)
लायब्ररी मस्त होती, मी भरपूर वाचून घेतलं. बर्यापैकी जिम होती, माझा त्यावेळी चालू असलेला व्यायाम नियमित चालू राहिला.मी भरपूर टेनिस आणि स्क्वॉश खेळून घेतलं. हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग या ‘ऐच्छिक’ बाबी होत्या - पण अर्थातच मी त्या शिकून घेतल्या. हॉर्स रायडिंगच्या ‘ट्रॉट’, ‘कँटर’, ‘गॅलपिंग’... या सगळ्या पायर्या पार केल्या. (मजा तर आलीच, पुढे रायगडचा कलेक्टर असताना त्याचा उपयोग पण झाला.) मसुरी परिसरातल्या ‘केम्प्टी फॉल्स्’पासून हरिद्वार-ऋषिकेशसकट हिमालय परिसरात, सुट्ट्यांच्या दिवशी भरपूर भटकंती केली. अॅकॅडमीत चांगला ‘फिल्म क्लब’ - आणि दुनियाभरच्या विविध भाषांमधल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा चांगला संग्रह होता - समग्र सत्यजीत रे - त्यांची ‘पथेर पांचाली’ सहित ‘अपु ट्रिलॉजी’ - शहरी शोषणाचं पिळवटून टाकणारं चित्रण करणारा ‘जनारण्य’... हे मी अॅकॅडमीत पाहिले. त्यावरची पुस्तकं वाचली, जाणकारांकडून भाष्य ऐकलं,त्यांच्याशी चर्चा केली. सार्वकालिक श्रेष्ठ असा जपानी दिग्दर्शक अकिरा कुरोसावाचा सार्वकालिक श्रेष्ठ ‘राशोमान’, हॉलिवुडच्या‘मॅग्निफिसंट सेव्हन’चा मूळ जपानी चित्रपट ‘सेव्हन सामुराई’ - असे खूप काही - चित्रपटविषयक, कलाविषयक जाणिवा प्रगल्भ व्हायला मदत झाली.
प्रशिक्षण काळात अभ्यास करून काही पेपर्स सादर करायचे होते. मी IAS होण्यापूर्वी ‘शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव’ मागणार्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होतो. म्हणून 1979-80 मध्ये कांद्याच्या भावावरून झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं लादलेल्या 3 रु. क्विंटलच्या जागी कांद्याच्या शेतकर्याला 70 रु. क्विंटल भाव मिळाला होता - त्याचे चाकण परिसरातल्या शेतकर्यावर झालेले परिणाम - यावर मी अभ्यास करून पेपर सादर केला होता. एक वर्ष कांद्याला भाव मिळाल्यामुळे शेतकर्याच्या हातात जास्त पैसा आला, तो शेतकर्यानं शेती-तंत्रज्ञान सुधारायला वापरला - त्यामुळे उत्पादन आणखी वाढलं - असं माझं ‘फाईंडिंग’ होतं. ‘शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित रास्त भाव’ मिळाल्यास शहरी औद्योगिक क्षेत्राकडून शेती - ग्रामीण क्षेत्राचं होणारं शोषण थांबलं. शेती - ग्रामीण क्षेत्राची क्रमश: ‘दरिद्रीकरणाची’ प्रक्रिया थांबेल - ग्रामीण भागात क्रयशक्ती निर्माण होईल, त्यामुळे भांडवल निर्मितीची प्रक्रिया सुरू होऊन - ग्रामीण भागात नवे उद्योग, त्यातून रोजगाराच्या नव्या संधी - परिणामी आणखी क्रयशक्ती आणि भांडवल निर्मिती - असं विकासाचं चक्र सुरू होईल... असं सर्व आम्ही शेतकरी आंदोलनात सांगत होतो - तेच चाकण परिसराच्या माझ्या अभ्यासात दिसून आलं.
असाच पेपर मी ‘ड्रायलँड फार्मिंग’ विषयावर तयार केला होता. दुष्काळप्रवण, पाणी टंचाईग्रस्त भागात, पाण्याची बचत करत शेती कशी करता येईल यावरचा तो पेपर होता. पुढे प्रशासनातल्या सर्व वर्षांमध्ये आणि आजही तो अभ्यास कामी येतो.
* * *
IAS अधिकार्याच्या प्रशिक्षणाचा 2 वर्षांचा कालावधी अतिशय सुनियोजित आहे : साडेतीन-चार वर्षांच्या ‘फाउंडेशन कोर्स’नंतर वेगवेगळ्या ‘अॅटॅचमेंट्स्’ आहेत. अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळण्यापूर्वी राष्ट्रीय जीवनाच्या वेगवेगळ्या संस्था तुम्ही जवळून पाहाव्यात अशी त्यामागे दृष्टी आहे.
त्यानुसार मला डिसेंबरच्या ऐन बर्फाळ कडाक्याच्या थंडीत काश्मिर मध्ये, भारतीय लष्कराच्या 10th Infantry Division च्या,ब्रिगेड 1/8 GR (गुरखा रेजिमेंट) बरोबर 3 आठवडे ‘आर्मी अॅटॅचमेंट’ करण्याची संधी मिळाली. गोरखालँड आंदोलनाचं नेतृत्व करणारे सुभाष घीशिंग 1/8 GR मध्ये होते. भारताचे कर्तबगार सरसेनापती, फील्ड मार्शल माणेकशा 2/8 GR मध्ये होते. मी प्रशिक्षण घेताना 1/8 GR - ब्रिगेड 161 चा घटक होतो. Co-Commanding Officer होते लोकनील टेंबे - आणि लष्कराच्या भाषेत2IC सेकंड इन कमांड - मेजर परशुराम नावाचा रुबाबदार, दिलदार मल्याळी अधिकारी. सेवेतून राजीनामा दिल्यानंतर 1999 च्या जून-जुलैमध्ये झालेल्या कारगिल युद्धातही मी भारतीय सैन्याबरोबर द्रास-कारगिल भागात होतो. ती व्यवस्था लावून देण्यात पुन्हा तेच होते. श्रीनगरमधल्या ‘बटवारा गेट’ या भागात भारतीय लष्कराचा तळ आहे - तिथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुढे मेजर परशुराम मारले गेले. त्यांनी दहशतवाद्यांना मशीनगन्स् घेऊन घुसताना पाहिलं. मेजर परशुराम रिसेप्शन ऑफिसमध्ये होते, त्यांनी आपल्या लष्करी तळाला धोक्याचा इशारा दिला, इतर सहकार्यांना सुरक्षितपणे बाहेर काढलं, दहशतवाद्यांचा हल्ला स्वत:च्या अंगावर घेतला. ते भारतासाठी शहीद झाले. 1986 साली 3 आठवडे त्यांच्या दयामाया न बाळगणार्या शिस्तीची मला मजा आली होती.
हिमालयातला एक ट्रेक करायचा असतो. तो मी अवघडातला अवघड असा एक ट्रेक म्हणून ‘पिंडारी ग्लेशियर’चा ट्रेक केला -हिमालयातले चालण्याचे 110 कि.मी. - आणि समुद्रसपाटीपासून 15 हजार फुटांवर... आणखी धमाल.
अॅकॅडमीत एकेका प्रांताचा ‘डे’ साजरा व्हायचा - तेव्हा त्या त्या प्रांताची वैशिष्ट्यं सादर करायची असतात. त्यावेळी मी ढोल-ताशा-झांज (आणि तोंड!) भरपूर वाजवून घेतलं.
SPH मध्ये ‘विविध गुणदर्शन’ व्हायचं. त्यात मी लिहिलेली ‘संघर्ष’ नावाची मूळ मराठी एकांकिका - हिंदी भाषांतर करून सादर केली. (त्या काळी मी स्टेजवर सुद्धा नाटकं करायचो!) दोनच पात्रं असलेलं हे नाटक - भोवतीच्या परिस्थितीबाबत अत्यंत संवेदनशील असलेला एक, व्यावहारिक जगतात तो ‘वेडा’ ठरवला जातो - आणि त्याचं ‘वेड’ समजणारा, पण त्याच्यावर उपचार करणारा डॉक्टर - अशी दोनच पात्रं. डॉक्टरची भूमिका केली होती IAS मधला सहकारी - डॉ.सुहेल अख्तर यानं. तो मध्यप्रदेशातला होता. त्याला सिक्किम केडर मिळालं होतं (‘वेड्या’चा रोल कुणी केला हे काय वेगळं सांगायला हवं का?!)
त्यावेळी टी.व्ही. वर - एकच राष्ट्रीय दूरदर्शन - DD चॅनेल होता - अजून केबल टी.व्ही.ची रेलचेल आली नव्हती. तेव्हा दूरदर्शनवर दर रविवारी सकाळी रामानंद सागर दिग्दर्शित ‘रामायण’ चालू होतं - त्यापायी देशाला वेड लागलेलं होतं. (थोडे मूठभर ‘बुद्धिवादी’सोडता रामायण-महाभारताचं देशाला हजारो वर्षं वेड लागलेलं आहे - जगाला सुद्धा.) तर दर रविवारी सकाळी देशभरचे रस्ते सुनसान असायचे. लोक स्नान करून गंधटिळा लावून, चपला-बूट न घालता किंवा काढून - टी.व्ही.समोर - शिस्तीत वेळेपूर्वी 5मिनिटं आधीच येऊन बसायचे - तिथे भारत देश वक्तशीरपणा पाळतो. लोक टी.व्ही.ला कुंकू लावायचे, नारळ वाढवायचे, हार घालायचे. मालिकेत काम करणार्यानं ‘ड्रिंक्स्’ घेणं बंद केलं होतं - लोकही त्या अभिनेत्यांनाच राम आणि सीता समजून त्यांच्या पाया पडायचे. पुढे रामाचं काम केलेला अरुण गोविल काँग्रेसमध्ये गेला आणि सीतेचं काम करणारी दीपिका चिखलिया आणि रावण - अरविंद त्रिवेदी भाजप मध्ये!
आम्ही पण न चुकता अॅकॅडमीमध्ये रविवारी सकाळी 9 म्हणजे 8.55 ला स्नान करून, चपला-बूट न घालता बसायचो.
आमच्याबरोबर असाच न चुकता सुहेल अख्तरही असायचा.
मित्रामित्रांमध्ये गंमत चालते (leg pulling) तसा मी एका रविवारी रामायणाचा ‘एपिसोड’ चालू असताना मधल्या ‘ब्रेक’मध्ये सुहेल अख्तरला म्हणालो, ‘यार तू यह क्या कर रहा है, हर इतवार को हमारे साथ रामायण देखता है - तेरी मजहब वाले तेरे को मजहब से निकाल देंगे ना!’
तर एकदम गंभीर होऊन तो म्हणाला, ‘ऐसा क्यों कह रहे हो अविनाश, रामायण क्या मेरी भी विरासत नहीं है?’ अनेक धर्मांधांना हे समजलं तर ‘भारत’ समर्थ होईल.
(त्या अख्तर नावातच काहीतरी जादू आहे - आठवा - जावेद, फरहान नावाचे अख्तर.)