Saturday, November 15, 2014


ऐतिहासिक विधानसभा निवडणुका




...आणि आपण सगळेच


               ऐतिहासिक विधानसभा निवडणुका
  सामान्य नागरिकाच्या दृष्टिकोनातून केलेले घडामोडींवरील भाष्य


                           जर मला कोणी विचारले, स्वातंत्र्यानंतरच्या काळातील, भारतातील सर्वांत महत्त्वाची, एकमेवाद्वितीय विधानसभा निवडणूक कोणती? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त परिणाम घडवून आणण्याची क्षमता असणारी निवडणूक? तर मी आत्ताच सांगतोय, ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक म्हणजे येणारी जम्मू आणि काश्मिर राज्याची विधानसभा निवडणूक
   जम्मू आणि काश्मिर (लडाखला विसरू नका) विधानसभा निवडणुका कार्यक्रम नुकताच जाहीर केलाय. या निवडणुका २३ नोव्हेंबरपासून पुढे टप्प्यांत घेतल्या जातील. आणि मतमोजणीच्या निकालाचा दिवस आहे २३ डिसेंबर.
   यावेळी जम्मू-काश्मिरमध्ये कडाक्याचा हिवाळा असणार आहे. रक्त गोठवून टाकणारी थंडी. निवडणुकीवर घाला घालू इच्छिणाऱ्या अतिरेक्यांची क्षमता निश्चितच कमी करेल आणि काश्मिरच्या मतदारांनीही अतिरेक्यांच्या धमक्या बासनात गुंडाळत वारंवार लोकशाहीविषयीची कमिटमेंट भरघोस मतदानाने सिद्ध देखील केली आहे. सध्या भारत पाकिस्तान संबंधांमधील तणाव थांबला आहे. त्यामुळे काश्मिर खोऱ्यांमध्ये चालणाऱ्या दहशतवादी कारवायांवर बंधने आली आहेत. काश्मिर खोऱ्यातील सामान्य जनतेमध्ये भारतीय राष्ट्रीयत्व रुजलेलं आहे, असं अजूनही म्हणता येणार नाही. परंतु ही जनता दहशतवादामुळे मात्र अत्यंत पिचलेली आहे. जम्मू आणि लडाखमधील जनतेने नेहमीच भारतीय राष्ट्रीयत्वाची भावना वेळोवेळी दाखवून दिलेलीच आहे. खरेतर सध्या मिळालेल्या रिपोर्टस्‌नुसार जनतेला नरेंद्र मोदींनी काश्मिरला दहशतवादाच्या विळख्यातून बाहेर काढावं, अशीच अपेक्षा व्यक्त केली आहे. जम्मू आणि काश्मिरमधील प्रादेशिक पक्षांनी याआधीच विश्वास गमावलेला आहे आणि काँग्रेस काही अजून सावरलेलीच नाही....
   जर भाजपाने जम्मू आणि काश्मिर जिंकलं (दचकू नका, हे शक्य आहे, माझा शब्द लिहून ठेवा) आणि हीच तर क्रांती आहे, ज्याच्याविषयी मी बोलतोय. जम्मू आणि काश्मिरलासुद्धा विकास हवाय, विशेषतः काश्मिरी युवक शिक्षण आणि नोकरीची मागणी करतोय. काश्मिरी जनतेला फक्त खऱ्याखुऱ्या प्रेमानं आणि विकासानेच जिंकता येऊ शकेल. बंदुकीचं टोक आता धर्मांध आणि दहशतवाद्यांसाठी आहे आणि त्यापैकी बरेच जण काश्मिरीसुद्धा नाहीयेत.
विकास हाच काश्मिरसाठीचा रामबाण उपाय आहे
आणि हाच उपाय नमोंनी ऑफर केलाय. पंतप्रधान होण्याच्या आधीपासूनच त्यांनी जम्मू आणि काश्मिरचे दौरे केले आहेत. सध्याच्या पुरामध्ये तर त्यांनी राज्याला अभूतपूर्व मदत केली आहे. (बीबीसीने कितीही वायफळ बडबड केली असली तरी त्याची पर्वा करता) त्यांनी दिवाळी काश्मिर खोऱ्यातच साजरी केली आणि तीसुद्धा सियाचीन ग्लेशियरवर आणि जनतेच्या सैनिकांच्या सोबतीनं. असं करणारे शेवटचे पंतप्रधान कोण हे तरी आपल्याला आठवतंय का? भाजपचा विजय किंवा जम्मू आणि काश्मिरमधील सर्वांत मोठा पक्ष म्हणून पुढं येणं हे संपूर्ण जगासाठी स्पष्ट संदेश देणारं ठरेल. (पाकिस्तान आणि चीन यांच्यासह साऱ्या जगाला...) काँग्रेसच्या विजयाने हा संदेश दिला जाणार नाही, असा कोणीही निष्कर्ष काढू नये. काँग्रेसचा विजयदेखील भारतीय राष्ट्रीयत्वाच्या सर्वसमावेशकतेचा आणि लोकशाहीचाच संकेत देणारा असेल. परंतु यावेळी पहिल्यांदाच भाजपच्या विजयाची चर्चा व्यापक पातळीवर सुरू झालेली आहे. जर अमेरिका अफगाणिस्तानातून जायच्या आधी हे घडलं तर अफगाणिस्तानातून अमेरिका परत गेल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीला भारत समर्थपणे हाताळू शकेल आणि त्यानंतर दहशतवाद्यांना काश्मिरकडे वळणं आणि अनर्थ घडवून आणणं दुरापास्त होईल.
हीच क्रांती आहे लोकशाही मार्गाने साध्य केलेली... हीच क्रांती आहे, विकासाच्या मार्गाने साध्य केलेली...